नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनचा काळ वाढवणं तसंच हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर देशातल्या बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री सहमत असल्याचं मेघालयाचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी उठवताना सावध भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एकमतानं प्रधानमंत्र्यांना सांगितलं.

कोरोना विषाणूचे देशातील रुग्ण वाढत असल्यामुळे टाळेबंदी उठवण्याबाबत काय करावं, यावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितलं.