नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसभेत दिली. या तक्रार निवारणीचा दर 90 टक्के इतका आहे असेही त्यांनी सांगितले.

या विभागाने ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही टोल फ्री हेल्पलाईन सुरु केली आहे. 1800-11-4000/14404 या क्रमांकावर ग्राहक फोन, एसएमएस किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात. या तक्रार निवारणासाठी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात. जर निश्चित काळात संबंधित कंपनीने तक्रार निवारण केले नाही तर ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवू शकतो असे दानवे यांनी सांगितले.