मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या  आझाद मैदानात  आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर गाऱ्हाणं मांडण्यात आल.

मराठा आरक्षण टिकावं यादृष्टीनं   न्यायालयात मराठा समाजाची बाजू सक्षमपणे मांडली जात नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी यावेळी केला. चांगले वकील दिले जात नाहीत, वकील आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याची तक्रार मेटे यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली, मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समिती निष्क्रिय ठरली आहे. त्यांच्याऎवजी अन्य कोणा सक्षम मंत्र्यांकडे उपसमितीचं नेतृत्व द्यावं, सारथी संस्थेचं रखडलेलं काम सुरू करावं,  आंदोलनादरम्यानचे खटले मागे घ्यावेत अशा विविध मागण्या मेटे यांनी केल्या. पुणे इथंही या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं.