मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या नांदेडसह अनेक जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु असून, बहुतेक धरणं भरली आहेत तर अनेक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नांदेड शहराजवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचं आणखी एक दार आज सकाळी साडे आठ वाजता उघडण्यात आलं. आता एकूण दहा दारांमधून दोन हजार ६८० घन मीटर प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीच्या वरच्या भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

गोदावरीचे हे पाणी खाली तेलंगणातील पोचमपाड धरणात जाते, मात्र पोचमपाड 98 टक्के भरले असून त्यातून सध्या 1 लाख 50 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र 100 टक्के भरल्यानंतर गोदावरीचे पाणी स्वीकारले नाही तर फुगवटा तयार होण्याची भीती आहे, त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. सध्या नांदेडच्या जुन्या पुलावर पाणी पातळी 347 मीटर आहे, इशारा पातळी 351 मीटर तर धोका पातळी 354 मीटर एवढी आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री पासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असून सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांमधे जिल्ह्यातल्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लोहा तालुक्यातल्या शेवडी इथं २६७ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या पोहनेर इथं गोदावरी नदीला पुर आल्यानं पोहनेर, डिग्रस, तेलसमुख, बोरखेड आणि ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासुन मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील टाकरवण, माजलगाव ढालेगाव यासह इतर लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. टाकरवण प्रकल्पाची १७ दारं, माजलगावची ३ तर ढालेगाव प्रकल्पाची १६ दारं उघडण्यात आली आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला.