नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे. मंडळाच्या कार्यकारी समितीच्या लखनौ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीनंतर मंडळाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.

या निर्णयावर फेरविचार व्हावा, अशी बहुतांश मुस्लिमांची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या न्यायहक्कासाठी भांडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातल्या अनेक मुद्यांवर अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळानं आक्षेप घेतला आहे.

न्यायालयानं मुस्लीम समुदायाच्या अनेक मुद्यांकडे दुर्लेक्ष केलं आहे, मशीदीसाठी अन्य कोणतीही जमीन किंवा जागा स्वीकारणं शक्य नाही. त्यामुळे निर्णयानंतर 30 दिवसाच्या निर्धारित कालावधीत फेरविचार याचिका दाखल केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.